नवं रक्षाबंधन

कालच एक ताजीताजी जाहिरात बघितली. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने बनवलेल्या ह्या मिठाईच्या जाहिरातीच्या माध्यमातून पुण्याच्या ‘चितळेबंधू’ यांनी करोनाकाळात असंख्य भावांचं आणि त्यांच्या परिवाराचं प्राणपणाने रक्षण करणाऱ्या ‘सिस्टर्स’साठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. “आपल्या जगण्याचा गोडवा ज्यांनी वाढवला, त्या सगळ्या भगिनींना आम्हा बंधूंकडून ही आदराची, प्रेमाची भेट!” - असं म्हणत यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त आपले नाव ‘चितळेबंधूभगिनी मिठाईवाले’ असे केले आहे. सध्या सोशल मिडियावर या जाहिरातीचं बरंच कौतुक होतंय. म्हणजे अनेकांना ह्या जाहिरातीतून मांडलेली बहीणींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची कल्पना आवडली असावी! मिठाईवाल्या चितळे बंधूंनी एक दिवसापुरती तरी स्वत:च्या ब्रॅंडनेममध्ये बहिणीलाही जागा दिली – हा नक्कीच चांगला बदल आहे.


आजवर आपण रक्षाबंधनाच्या जाहिरातींमधून बरेचदा बहीणभावाच्या प्रेमाची गोडगोड कौतुकंच पाहिली होती. बरेचदा अल्लड वयातले ‘छोटेसे बहीणभाऊ’ या जाहिरातींमध्ये दिसायचे किंवा क्वचित अगदीच वयोवृद्ध भावंडं दाखवली जायची. पण जाहिराती असोत किंवा गाणी असोत, नाहीतर टीव्ही मालिका – बहुतेक वेळेला भावालाच रक्षणकर्त्याच्या भूमिकेत ठेवलेलं असतं! वास्तवात जरी अनेकदा बहिणीच भावाचं संगोपन आणि रक्षणसुद्धा करीत असल्या तरी परंपरेने भावाला दिलेली राखणदाराची भूमिकाच माध्यमातून मांडली जात असे. काळानुसार बहीणींच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडत गेला, तरी रक्षाबंधनाचा सण साजरा करायच्या पद्धतीत मात्र आपण बदल केलाच नाही! बहिणीने भावाला राखी बांधून त्याला ‘रक्षण करायची विनंती करणं किंवा आठवण करून देणं’ यात काही विषमता आहे – हे कदाचित समाजमनाला फारसं जाणवलं देखील नव्हतं. जेव्हा कधी स्त्रीवादी दृष्टिकोनातून भारतीय सणांचं विश्लेषण करायचा प्रयत्न झाला तेव्हा त्यावर कडाडून टीका केली जात असे. पण आता टीव्ही मालिकांसारख्या पॉप्युलरमीडिया मधून बहिणीला राखी बांधणाऱ्या भावाची गोष्ट सांगितली जाते – तेव्हा त्याचं कौतुक केलं जाऊ लागलं आहे. हा नक्कीच स्वागतार्ह बदल आहे! पण इतक्याशा प्रतीकात्मक बदलावर थांबून राहणं आता पुरेसं नाहीये.
लुंबा राखी 
आपले सण म्हणजे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. म्हणूनच संस्कृतीचा प्रवाह सुरू ठेवायचा असेल तर सण साजरे करताना त्यात कालानुरूप बदल देखील करायला पाहिजेत. खरंतर आपल्या देशात एकच सण वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात विविध पद्धतींनी साजरा केला जातो. अगदी राखीपौर्णिमेचंच उदाहरण पाहूया. राखी पौर्णिमा जास्त करून उत्तर भारतात साजरी केली जात असे. भावाच्या मनगटावर बहिणीने रेशमाचा धागा बांधायची प्रथा बहुतकरून सगळीकडे दिसते. पण राजस्थानात भावाच्या बरोबरीने त्याच्या पत्नीला सुद्धा राखी बांधायची पद्धत असते. ही राखी जास्तच सुशोभित असते. तिला लुंबा राखी असं म्हणतात. कर्नाटकातल्या काही गावांमध्ये श्रावणात तंगी बीज आणि अक्कन तीज नावाचे सण असतात. 'तंगी बीज' या दिवशी मोठी भावंडे धाकट्या बहिणीला ओवाळतात. त्यांच्यासाठी गजरे तयार करतात. त्यांच्या आवडीचे पदार्थ करतात. एवढेच नाही तर बहिणीचे जे नेहमीचे घरकाम असेल तेही करतात. धाकट्या बहिणींची लग्न झाली असतील तर मोठे भाऊ आणि बहिणी धाकट्या बहिणीच्या सासरी फराळाच्या आणि नव्या कपड्याच्या टोपल्या घेऊन जातात. तिथे जाऊन त्यादिवशीची तिच्या शेतातली आणि घरातली सगळी कामे करतात. भाऊ भावजय आणि मोठी बहिण आणि तिचा नवरा हेही त्यामध्ये सामील होतात. तसंच 'अक्कन तीज' हा मोठ्या बहिणींचा सण असतो. एवढी गोड प्रथा अगदी दूरवरच्या छोट्या खेड्यातच फक्त पाळली जाते, बाकी तिथल्या जवळच्या मोठ्या गावातील लोकांनाही त्याबद्दल क्वचित माहिती आहे. पण रक्षाबंधनाच्या सणालाही अशा निराळ्या पद्धतीने साजरा करता येऊ शकेल ना?
पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन साजरं करताना भावावर बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी टाकली जाते. बहीणीवर संकट आलं तर तिच्या मदतीला धावून जाणे – हे तर महत्त्वाचं आहेच. पण काही भाऊ ही जबाबदारी इतकी मनावर घेतात की बहिणीच्या मोकळेपणाने वावरण्यावर, पोषाखावर आणि घराबाहेर जाण्यायेण्यावर देखील ते बंधनं घालायला लागतात. असे भाऊ एकप्रकारे बहिणीला मानमर्यादांच्या पिंजऱ्यात जखडून टाकतात. थोडक्यात, बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणजे भावांच्या हातची छडी बनते. आपल्या सगळ्याच सणांच्या मुळाशी असलेली पितृसत्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणभावात देखील अशी विषमता तयार करते! पण त्याऐवजी बहीणभावाच्या नात्यातली समता दृढ करण्याची संधी म्हणून देखील रक्षाबंधनाच्या सणाकडे पहाता येईल. बहीणीवर संकट आलं तरी ती कोलमडून पडणार नाही, परावलंबी व्हायची वेळ येणार नाही - यासाठी तिला पाठिंबा देण्याचे काम भावांना करता येईल!
आज अनेकदा असं घडतं की वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झालयावर स्त्रियांना नवऱ्याच्या घरातून बाहेर हाकलून लावलं जातं. बहुतेकवेळा स्त्रियांना सासरी छळ सहन करीत जगत राहायची किंवा छळामुळे मरून जायची वेळ येते – कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र असण्यासाठी तिचा संपत्तीवरचा हक्क महत्त्वाचा ठरतो. स्त्रियांचा जन्मघरच्या आणि वैवाहिक, अशा दोन्ही ठिकाणच्या संपत्तीचा हक्क डावलला जातो. स्त्रियांच्या नावावर अतिशय कमी संपत्ती असते आणि त्यापैकी त्यांच्या नियंत्रणात असलेली संपत्ती आणखीनच कमी आहे! हे चित्र बदलावे यासाठी राखीपौर्णिमेच्या निमित्ताने भावांनी बहिणींचा संपत्तीतला हक्क मान्य करायला हवा आणि त्यासाठी कायदेशीर पाऊल देखील उचलायला हवे. समजा सध्या भावांच्या नावावर संपत्ती नसली, तरी पुढे जेव्हा केव्हा ती होईल तेव्हा बहिणींना त्यांचा हक्काचा वाटा मिळेल असे वचन भावांनी बहिणींना जाहीरपणे दिले पाहिजे! अनेक कुटुंबातून संपत्तीची वाटणी करायची वेळ आल्यावर बहीणींच्या कडून ‘हक्कसोडपत्र’ घेतले जाते. मुलींच्या लग्नात खर्च केला जातो, कधीकधी हुंडा दिला जातो – त्यामुळे स्त्रियांनाही आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटणी मागणे योग्य वाटत नाही. पण स्त्रियांनीसुद्धा असा अपराधभाव बाळगायची गरज नाही, हे लक्षात घ्यायला हवे. लोकशाही उत्सव समितीतर्फे स्त्रियांच्या संपत्तीच्या हक्कांसाठी मोहिम सुरू केली जात आहे. 
(वर्षभर चालणाऱ्या मोहिमे विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया सीमा - 9890568577, शंकर -9552167702, राधाकृष्ण देशमुख - 9011620595 या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.)

लोकशाही उत्सव समितीने असे सुचवले आहे की राखी पौर्णिमेच्या दिवशी भावंडांनी एकमेकांना पाठिंबा देण्याचा, बहिणींना संपत्तीत सुद्धा समान हक्क आहेत हे समजून घेण्याचा, एकमेकांच्या मदतीला येण्याचा संकल्प मात्र जरूर करावा आणि तो पाळावा देखील! स्त्री ही रक्षण करण्याची 'वस्तू' नाही, जिवंत 'माणूस' आहे म्हणून शक्य असेल तर राखी बांधणे आणि बांधून घेणेच पूर्णपणे नाकारावे! किंवा त्याऐवजी भाऊ आणि बहीण यांनी एकमेकांना आणि हवंतर बहिणीने बहिणीला, भावाने भावालासुद्धा राखी बांधावी! एकत्र येऊन आनंद साजरा करण्याला समतेचं अधिष्ठान असेल तर सणाची गोडी नक्की वाढेल नाही का? तुम्हाला काय वाटतं?

 

वंदना खरे 

संपादक, 'पुन्हास्त्रीउवाच' 

 

 

14 comments:

  1. अतिशय योग्य विचार, तर्कशुद्ध.

    ReplyDelete
  2. खरं आहे, तर्कशुद्ध मांडलं आहे.

    ReplyDelete
  3. नक्कीच आवडेल मी सुरवात करीन

    ReplyDelete
  4. खूपच महत्वाचं आहे हे!
    महाराष्ट्रातही काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला पहिल्या मुलीची'अश्र्विनी' साजरी केली जाते. तिला ओवाळलं जातं. राखीपौर्णिमेच्या बाबतीत
    सणाचा गोडवा, बहीणभावांचं प्रेम हे नक्कीच हवं. तरीही बहीण काय किंवा भाऊ काय यांनी सक्षम असणं, आईवडिलांनी मुलाबरोबरच मुलीलाही तितकंच सक्षम बनायला मदत करणं आवश्यक आहे. मुलीला कायम भावाकडे संरक्षक म्हणून बघण्याची गरज नाही. तिला चांगलं शिक्षण मिळालं, विचार करण्याची शक्ती प्राप्त झाली, आईवडिलांच्या संपत्तीतला तिचा समान वाटा मिळाला... थोडक्यात तिला सन्मान मिळाला की ती तिला आत्मविश्र्वास मिळतो. आणि ती सबला होते. तिला तिच्या पायावर उभे रहाण्याची शक्ती आणि संधी मिळू देणे ही गोष्ट राखीच्या निमित्ताने का होईना जर झाली तर आनंदाची गोष्ट होईल.
    भावावरची जबाबदारी थोडी कमी होईल. बहीणभावांचं प्रेम वाढेल. आज सुध्दा काही ठिकाणी या गोष्टी घडताना दिसत आहेत. त्या सार्वत्रिक होवोत हीच इच्छा!

    वंदना , लेख खूपच चांगला आहे.

    अंजली

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे, अंजली.
      थॅंक यू.

      Delete
  5. Very true.... सगळ्यांनी हे समजले पाहिजे. काही वर्षीनी हे असेच होईल. सगळ्यांच्याच हातावर राखी दिसेल किंवा कोणीच स्त्री राखी बांधणार नाही. राखी बांधून भावाला रक्षा करण्याचा संकेत न देता स्वतःची रक्षा करण्यास समर्थ आहोत हा confidence सगळ्या स्त्रियांना येईल.
    मस्त वंदना . तू नेहमीच छान विचार करतेस आणि करायला लावतेस. Thank You

    ReplyDelete
  6. वंदना खरे ताई तुम्ही मांडलेले विचार अतिशय सुंदर व योग्य आहेत. पण पूर्ण वर्षवर किंबहुना रोजच हे चांगले विचार प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केले पाहिजेत.

    आपल्याकडे एका दिवसा पुरता मर्यादित खूप गोष्टी आहेत पण तुम्ही मांडलेली कल्पना कायम अमलात यायला हवी ह्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत....

    ReplyDelete
    Replies
    1. हो ध्रुवाली . वर्षभर हे विचार अमलात आणण्याची आठवण असे दिवस करून देतात.

      Delete