स्वातंत्र्याचा साक्षात्कार - 1

 

शालिनी आचार्य

तसे पाहिले तर आम्ही चौघी बहिणी आणि पाचवी माझी आई अशा स्रीयांच्या चौकटीत मी मोठी झाले. तू बाईची जात आहेस, मुलीच्या जातीने असं असावं, तसं वागावं, कमी बोलावं, जास्त हसू नये - याची समज आम्हा बहिणींना अगदी चौथी,पाचवीत असल्यापासून आई,वडिलांनी करून दिली. समजायला लागल्यापासून अनेक प्रश्नांची सरबत्ती मनात असायची, उकल मात्र कोणाकडेच करता यायची नाही. आपल्याला नेमके काय हवयं ते सांगताच यायचे नाही. मनाची घालमेल व्हायची. स्वतंत्र विचार तर फार लांबची गोष्ट होती माझ्या साठी...
लग्नानंतरसुद्धा नवऱ्याला विचारायची सवय लागली. पण त्याने मात्र माझी ही सवय मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मी तर असं म्हणीन की, त्यानेच माझ्या स्वतंत्र विचाराचा पाया घातला - ‘तू तुला हवे ते कर, तुझे निर्णय स्वतः घे. तुझं तू ठरवत जा.’
मला थोडं गोंधळल्यासारख होत असे. पण मी लग्नानंतर हळूहळू माझ्या घरात तरी निर्णय घ्यायला लागले.
एक छोटासा अनुभव आहे. एकदा 26 जानेवारीला माझ्या मुलींना कळसूबाई शिखरावर गिर्यारोहणसाठी जायचं होतं. फी जरा जास्त होती. पण मुलींना जायचंच होतं. आणि पैसे तर मिस्टरांकडून घ्यायचे होते. पण ते तयार नव्हते, - “इतक्या लांब मुली जाणार कश्या? अनोळखी लोक असणार, तू कसं काय पाठवते? पैसे सुद्धा जास्त आहेत” अशी एकेक कारणं पुढे आली.
मुलींची तोंडं छोटी झाली. मग मी त्या टीमशी बोलून पैसे कमी करण्याची विनंती केली. त्यांनीही ते मान्य केले. आता राहिला प्रश्न नवऱ्याच्या परवानगीचा. पण ती काही मिळाली नाही !
मग आम्ही तिघीही परवानगी न घेताच रागारागात निघालो. मी मुलींना म्हणाले, “चला, मी आहे सोबत...”
अलिबाग वरून पुण्याची बस पकडली. ज्या मैत्रीणकडे जाणार होतो ती खूप दूर होती. रात्रीच्या वेळी कसं करावं, हा प्रश्न मनात निर्माण झाला. पण प्रवासात बहिणीचा फोन आला. ती म्हणाली, “माझ्या मैत्रिणीकडे आकुर्डीला जा.” तिला मी ओळखतही नव्हते. पण मग ठरवलं जाऊयात! घरी कुणालाच विचारलं नाही,सांगितलं नाही. माझा मीच निर्णय घेतला.
तिथे पोचल्यावर मात्र कळवले, ‘मी बहिणीच्या मैत्रिणीच्या घरी सुरक्षित आहे.’
त्या मैत्रिणीने, तिच्या वडिलांनी खुप मदत केली. मला अजिबात परक्यासारखं वाटलं नाही. मुली कळसूबाईला गेल्या, दोन दिवस मी तिथेच राहिले. तिसऱ्या दिवशी आम्ही घरी अलिबागकडे निघालो. पण आम्हाला मिस्टर घ्यायलाही आले नाही. घरी गेल्यावर मुलींनी त्यांना सगळं सांगितल्यावर मात्र ते खूश झाले. मग डोळ्यांनीच मला थँक्यू म्हणाले.
आधी मी आई वडीलांची मुलगी, भावाबहिनीची बहीण,नवऱ्याची बायको, मुलींची आई होते आणि अजूनही आहे ... पण आता मी स्वतःवर प्रेम करणारी, ठाम निर्णय घेणारी माझी मी झाले आहे. आता नो पिछे मुड...अभी तो आगे ही चलना है.

असु देवकी

आई वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या लग्नाची घाई सुरु झाली. त्यामुळे माझ्या वहिनीने लग्नाची जबाबदारी स्वत:वर घेतली होती.
‘आता लग्न कर. तू एकटा कसा जगशील?’ असे ती मला नेहमी म्हणत असे.
मी एक मुलगा असलो तरी मला मुलगेच आवडतात - हे सांगणे मला कठीणच वाटायचे. माझ्यावर लग्नाचा दबाव वाढतच चालला होता. सध्या जरी सौम्य भाषेत हे सगळे प्रकरण सुरु असले तरी सतत ही चर्चा चालू असायची.
शेवटी एका संध्याकाळी मी सांगूनच टाकले, कि मी "गे" आहे. पण माझ्या घरी ‘गे’ म्हणजे काय तेच समजले नाही. लग्नाची चर्चा सुरूच राहिली.
मग मी त्यांना स्पष्ट शब्दात समजाऊन सांगितले, “ मी गे आहे म्हणजे मी समलिंगी आहे. म्हणजे मला मुलगे आवडतात. मला मुली आजिबात आवडत नाही. मी फक्त मुलांसोबत प्रेम आणि सेक्स करतो!”
त्यानंतर काही दिवस घरात सन्नाटा पसरला होता.
मग मीच एक दिवस विचारले, “काय झाले? तुम्हाला माझ्या लैंगिकतेची ओळख पटली का?
तेव्हा वहिनी म्हणाली, “तुमच्या चित्रपट क्षेत्रात हे चालतेच बाबा ...”
माझ्या लक्षात आलं की वहिनीने आणि भावाने बहुतेक "गे" म्हणजे काय, हयाविषयी हे गूगल केले होते. आणि गूगलने चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची माहिती दाखवली होती. पण त्याचा फायदा असा झाला की यानंतर कोणताही मानसिक त्रास न देता मला माझ्या संपूर्ण परिवाराने स्वीकारले. मला एखादा मित्र मिळाला आणि मी त्याच्यासोबत राहीलो तरी माझ्या वहिनीला चालणार आहे! माझ्या वहिनीची बहिण ज्योतिषतज्ञ असल्याने आता ती माझ्या साठी चांगल्या मुलांच्या पत्रिका जुळवून पाहते. बघू आता मला मनासारखा मुलगा कधी मिळतोय !!!
पण माझी लैंगिकता त्यांनी स्वीकारल्यानंतर मला ‘स्वतंत्र’ असल्याचं फीलिंग आलं, एवढं मात्र खरं !


सोनाली देशपांडे


स्वातंत्र्य शब्दाला खूप छटा आहेत. खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी मात्र हा अनुभव खूप वेगळा असतो.

माझ्या आईबाबांच्या घरी मी स्वातंत्र्यातच जगत होते . अनेक मोठे निर्णय घेताना घरचे कधीच आड आले नाहीत. दहावीनंतर कुठे जायचं, नोकरी, जोडीदार अशा अनेक महत्त्वाच्या बाबतीत माझे मीच निर्णय घेतलेले आहेत. लग्नानंतरही सहमतीने काही ठरवलं तरी स्वातंत्र्य संपलं असं कधीच वाटत नाही.
इतकं सगळं मोकळं वातावरण असतानाही, एका क्षणी मी स्वतंत्र असल्याचा खास आनंद झाला. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे - माझा एक मामा त्याच्या उतारवयात बंगलोरला जाऊन स्थायिक झाला होता. माझं आणि मामाचं चांगलं गुळपिठ जमायचं. बंगलोरला असताना तो सीरियस झाला. त्यावेळी मला त्याला भेटायला जायचं होतं. अनेक नातेवाईकांना माझ्या सोबत चला, विमानाने जाऊया – असं सांगूनही कुणी तयार झालं नाही. काही दिवसांनी मामा जग सोडून गेला आणि त्याला भेटू शकले नाही ही हुरहुर आजही आहे. त्यावेळी नुसती हुरहुर नाही तर हेल्पलेसनेसची भावना होती!
नंतर काही वर्षांनी ibnlokmat मध्ये काम करताना आमचे संपादक निखिल वागळे सरांनी मला गोव्याला जाऊन फिल्म फेस्टिव्हल कव्हर करायला सांगितलं. कंपनीने विमानाचं तिकीटही दिलं. मला एकटीने प्रवास करायचा होता. मनात धाकधुक होतीच. पण विमानतळावर गेल्यापासून विमानात बसेपर्यंत व्हीलचेअर घेऊन माणूस सोबत होता. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीसाठी विमान प्रवास किती सोपा हे जाणवलं आणि पहिल्यांदाच एका वेगळ्या स्वातंत्र्याची जाणीव झाली. आपण बंगलोरलाही एकटे जाऊ शकलो असतो, हे लक्षात आलं.
कुणाच्याही मदतीशिवाय छोटीशी गोष्ट करणं ही अपंग व्यक्तींसाठी स्वातंत्र्याची भावना असते. इथे तर मला किती मोठी गोष्ट गवसली होती. याच बळावर पुढचे अनेक प्रवास सोपे झाले!

 

7 comments:

  1. स्वातंत्र्याच्या छटा आणि रंग व्यक्तिनुसार कशा बदलतात याचे सुरेख उदाहरण आहे हे. त्याचबरोबर स्वातंत्र्य किती मौल्यवान असते आणि त्यासाठी कोणाकोणाला काय किंमत मोजावी लागते हे सांगणारी ही उदाहरणे आहेत.

    ReplyDelete
  2. phar mahatvache lihile ahe. agdi chhotya chhotya goshti n pasun jeevanatalya khup mahatvachya ani jivhalya chya vishaya n paryant swatantrya chi kiti vyapti ahe he lakshat yete ahe.

    vandana chhaan kaam karate ahes.

    anjali

    ReplyDelete
  3. किती महत्वाच्या विषयावर बोलत केलय सगळ्यांना, अभिनंदन पुस्त्रीउ !!छोटा वाटला तरी आपल्या स्वातंत्र्याचा अनुभव खूप पुढे घेऊन जाणारा असतोच, आणि जोडीने जबाबदारी स्वीकारायची जाणीव देणारा...

    ReplyDelete
  4. किती महत्वाच्या विषयावर तुम्ही लोकांना संधी दिली ...धन्यावाद वंदना ..

    ReplyDelete