सोईचं आणि सुटसुटीत

आई, आजी आणि जेवण बनवायला आवडणारी मोठी बहीण माहेरी असल्यामुळे माझा जेवण बनवण्याशी फारसा कधी संबंध आला नाही. मासे साफ करून देणं, शिंपल्या विळीवर चिरून देणं, फणसाची भाजी करायची असेल तर तो चिरून देणं, ताडगोळे पाणी बाहेर न येता सोलणं, फळे चिरणं - ही थोडीशी अवघड आणि कौशल्याची कामं करायला मी नेहमी तयार असायचे; पण गॅसजवळ उभं राहून रोजचं जेवण किंवा साग्रसंगीत स्वयंपाक यात कधी रस नव्हता. आई पण नोकरी करणारी असल्याने, लहानपणापासून पोळ्या करायला बाई होती. सकाळी सगळ्यांच्या डब्यासाठी पोळी आणि सुकी भाजी असायची. रविवारी मासे. पप्पा मासे खात नसल्याने त्याच्यासाठी वेगळं व्हेज जेवण बनायचं. माझी आई सारस्वत, वडील कऱ्हाडे, वडिलांची आई - पंढरपूरला राहणारी कोकणस्थ ब्राह्मण, तर आजोबा कोकणांत वाढलेले - हे यासाठी सांगतेय की जेवणाचे अनेक वेगवेगळया पद्धतीचे पदार्थ मला लहानपणापासून पहायला चाखायला मिळाले. घरात ह्याच प्रथा पाळल्या पाहिजेत वगैरे कुठलीच भानगड नव्हती. दिवाळीचा फराळही आम्ही बाहेरून आणायचो, फक्त चिवडा किंवा शन्करपाळे घरी करायचो. देवाचं वगैरे पाळणं असलं काहीच नसल्याने - चतुर्थीला मोदक किंवा नैवेद्य वगैरे सगळ्यावर काट होती. घरी कधी हळदीकुंकू, सत्यनारायण, गणपती, नवरात्र असले काहीच नसल्याने - भरपूर लोकांसाठी स्वयंपाक करणं वगैरेही नव्हतं.

तरीही आज जरा निरखून सगळ्या आठवणींकडे पाहिलं की जाणवतं,घरातल्या पुरुषावर स्वयंपाकघरातील कुठलीच जबाबदारी नव्हती. आईने नोकरी सांभाळून हे सगळं सांभाळायचं हे न बोलता ठरल्यासारखं होतं आणि आईनेही हे बदलण्यासाठी कधी फार आग्रह धरल्याचं मला आठवत नाही. आईने सारस्वत पद्धतीने काही केलं की ते टेस्ट करून पाहायला पप्पा फारसा उत्सुक नसायचा. अजूनही त्याला ठरावीक चवीचंच जेवण लागतं. आई शक्यतो तिच्या आवडीचे सारस्वत पदार्थ हमखास, ती एकटी असताना करायची. कारण नाहीतर तिला बाकीच्यांसाठी वेगळं काहीतरी बनवायला लागायचं. घरी मासे केल्यावर, ‘केवढा वास भरलाय” - असं एक वाक्य हमखास ऐकायला यायचंच आणि त्यात कुठेतरी हे आपल्याच घरातल्यांचं आवडतं जेवण आहे हा स्वीकार नसायचा. मला ही भाजी नको, मग मला वेगळं काहीतरी कर वगैरे नखरे माझ्यापासून सगळ्यांचे असायचे आणि आई ते का खपवून घ्यायची? असा मला आज प्रश्न पडतो. तिच्यावरचे जेवणाचे ताण मला मी जेवण बनवायला लागल्यावर प्रकर्षाने जाणवू लागले.
ह्या सगळ्या अनुभवातून, मी लग्न झाल्यानंतर जेवण बनवायला लागले तेव्हा मी माझ्यापुरत्या काही गोष्टी पक्क्या केल्या होत्या. किचन ही फक्त माझी जबाबदारी नसेल हे मी आधीच माझ्या जोडीदाराशी बोलले होते. आजही जेव्हा त्याची सुट्टी असते तेव्हा जेवण तो बनवतो. पोळ्या करायला मला खूप कंटाळा येतो . त्यामुळे पोळ्या करायला आमच्याकडे बाई येतात. त्यांची सुट्टी असेल तर मी थालीपीठ, आंबोळ्या, खिचडी काहीही करते पण पोळ्या लाटत बसत नाही. मला स्वयंपाकाची विशेष आवड नसल्याने ( फक्त माश्याचे जेवण हा अपवाद ) मी झटपट होणाऱ्या भाज्याच करते . भांडी लावायला मला कंटाळा येतो, जेवण झाल्यावर ओटा पुसणे, शेगडी पुसणे, पोतेरं फिरवणे ही माझी दोडकी कामं आहेत. ती शक्यतो नवरा करतो. आता माझा ६ वर्षांचा मुलगा पण - ताटं घेणे, पोतेरं फिरवणे - वगैरे कामे करतो. काहीवेळा जेवण बनवता बनवता मल्टी टास्किंग करतेय असं स्वतःला सांगून मी भांडी लावून टाकते. लग्नाला ७ वर्ष होऊन गेलीत तरी मी अजून घरी पुरणपोळी, गुळपोळी, मोदक, बिर्याणी, श्रीखंड, फराळ असले वेळखाऊ आयटम बनवलेले नाहीत. बाहेर घरगुती पद्धतीने बनवलेले हे पदार्थ आणून आपला किचनमधला वेळ वाचवावा आणि एखाद्या बाईला पण त्यातून रोजगार मिळावा हे मला आवडतं. हे ही लग्नाआधीच स्पष्टपणे बोलले होते. सासूची जेवण बनवण्याची पद्धत व माझी यात खूप फरक आहे. त्या किंवा मी एकमेकींकडे जातो तेव्हा - मी बनवेन तेव्हा माझी पद्धत आणि त्या बनवतील तेव्हा त्यांची ! इतका साधासोपा मार्ग काही न बोलताच ठरून गेलाय. उलट एकमेकींना वेगळ्या काही रेसिपी विचारून कधीतरी केल्याही जातात.
अजून एक मी कटाक्षाने पाळते, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसणे आणि आपापलं वाढून घेणे. मी वाढपी नाही. घरी पाहुणे आले तर ‘पुरुष आधी, बायका नंतर’ - असले प्रकार माझ्या डोक्यात जातात. त्यामुळे त्यावर फुली आहे. पाहुणे येणार असतील तरीही झटपट होणारे प्रकारच मी करते. वाटलं तर २ पदार्थ घरी आणि २ बाहेरून मागवते. पण माझा किचन मधला वेळ उगीचच वाढणार नाही हे आधी पाहते. तसंच मी सारखी किचनमध्ये आणि पाहुणे बाहेर - असं होणार नाही आणि मला पण गप्पा मारायला वेळ मिळेल असेच पदार्थ मी निवडते. (उदा - पाहुण्यांना गरम गरम डोसे काढून देणे असा मेनू मी कधीच ठेवणार नाही. उलट आयत्यावेळी गरम करून खाता येतील असे पदार्थ मी करते.) बाई सुगरण असली पाहिजे वगैरे गोष्टी मला ओव्हररेटेड वाटतात. किचनचा वेळ कमी करून स्वतःला आवडेल त्या गोष्टी करायला वेळ काढण्यासाठी मी नवीन नवीन पर्याय शोधत असते. आणि हो; याचा कोणताही गिल्ट किंवा फुकाचा अभिमान मी बाळगत नाही.

सई तांबे  

 

 

 

14 comments:

  1. एकदम बरोबर...
    किती ओझी घेऊन जगत असतात बायका...झुगारून द्यायची वेळ आली आहे

    ReplyDelete
  2. अनुकरणीय...मस्तच सई

    ReplyDelete
  3. पूर्ण सहमत

    ReplyDelete
  4. Perfect. I agree with each and every u have written 👍mi pan exactly asach karate.

    ReplyDelete
  5. Perfect. I agree with each and every u have written 👍mi pan exactly asach karate.

    ReplyDelete
  6. लेख आवडला,अनुकरणीय,But difficult to implement for me.

    ReplyDelete
  7. लेख आवडला,अनुकरणीय,But difficult to implement for me.

    ReplyDelete
  8. perfect. Mi mala avdtya padarth karnyache pan khoop sare short cuts shodhale ahet..

    ReplyDelete
  9. एकदम बरोब्बर,
    सई, तुझं लेखन मला नेहमीच आवडतं
    तू सकाळ पेपर मध्ये पण लिहायचीस,ते मला आवडायचं

    ReplyDelete
  10. स्पष्ट्पणे घेतलेल्या भुमिकेसाठी सलाम!

    ReplyDelete
  11. अगदीच पटलं बघ सई, पण मी स्वतः तुझ्या आईसारखी एकटीच सगळं करत राहिले परंतु आता मला दोन मुलगे आहेत तर ते त्यांच्या बायकांसोबत किचन मध्ये काम करतात आणि मला ते खूप आवडतं.

    ReplyDelete
  12. अगदीच पटलं बघ सई, पण मी स्वतः तुझ्या आईसारखी एकटीच सगळं करत राहिले परंतु आता मला दोन मुलगे आहेत तर ते त्यांच्या बायकांसोबत किचन मध्ये काम करतात आणि मला ते खूप आवडतं.

    ReplyDelete