हक्क - नेहा उजाळे

राणासिंग म्हणजे गावची बडी आसामी. पैशाअडक्याची काहीच कमतरता नव्हती. त्यांच्या धर्मपत्नी सरस्वतीदेवी अतिशय सुंदर, मायाळू, दानधर्म करणाऱ्या होत्या. गरीब घरातल्या असल्या तरी त्यांच्या सौन्दर्यावर राणासिंग भाळले होते. त्यांच्या संसारात एक खंत होती ती म्हणजे त्यांना मुलबाळ नव्हते. दहा वर्षे लोटली तरी घरी पाळणा हलला नव्हता. सरस्वतीदेवी कितीतरी वेळा नवऱ्याकडे दुसरे लग्न करा म्हणून लकडा लावायच्या. पण राणासिंग या गोष्टीला त्यांच्या बायकोच्या प्रेमापोटी तयार होत नसत.

इथे सरस्वतीदेवी मूल होत नाही म्हणून खचत चाललेल्या होत्या. एके दिवशी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांचे डोळे लकाकले आणि त्यांनी पतीला कल्पना सांगितली. राणासिंगनी आधी नकार दिला पण घराला वारस मिळेल यासाठी ते तयार झाले.

सरस्वतीदेवी लागलीच आपल्या माहेरी गेल्या. घरची अतिशय गरीबी. सरस्वतीदेवी सगळ्यात मोठ्या. त्यांच्या पाठच्या तीन बहिणींच्या लग्नाचा खर्च राणासिंग यांनी उचलला होता. धाकटी अठरा वर्षांची बहीण लग्नाची होती. सरस्वतीदेवीनी आईवडिलांना आपल्या डावात सामील केले आणि धाकट्या बहिणीला घरी आणले. नंदिनी अठरा वर्षांची असली तरी उफाड्याची होती. तिचं वाडीतल्या महेशवर प्रेम होतं. दोघांनी घरात संमती घेऊन लग्न करायचे ठरविले होते. नंदिनी ताईकडे जाते आहे म्हणून महेश खूप दुःखी झाला. पण थोड्या दिवसाचा प्रश्न आहे असे वाटून ताईच्या मोठ्या वाड्यात राहायला जायचे म्हणून नंदिनी खूप खुश होती.

सरस्वतीदेवीनी नंदिनीला पैठणी साडी नेसवून, ठसठशीत दागिने घालून सजवले. इतकी भारी साडी आणि दागिने तिने कधी पाहिले नव्हते. साडी सावरत पूर्ण वाड्याभर गिरकी घेत होती. रात्री सरस्वतीदेवींनी तिला आपल्या शेजारी झोपवले. मऊ गादी आणि मऊ रजईमुळे तिला लगेचच गाढ झोप लागली. थोडयावेळाने नंदिनीला आपल्या अंगावर कोणीतरी असल्याचा भास झाला. ती ओरडणार तर तिचे तोंड घट्ट दाबले आणि तिचे कौमार्य कुस्करले गेले. तिला कळून चुकले ती व्यक्ती कोण आहे. तिचं प्रेम, तिच्या इच्छा - आकांक्षा एका क्षणात गळून पडल्या. अशा कितीतरी रात्री गेल्या. अखेर नंदिनीला दिवस गेले.

सरस्वतीदेवी आणि राणासिंगना खूप आनंद झाला. तिची एखाद्या राणीसारखी बडदास्त ठेवण्यात आली. आपल्या ताईचा आणि दाजींचा डाव तिच्या लक्षात आला होता. मूल झाल्यावर ताईच्या हवाली ते बाळ करायचे होते आणि नंतर एखादया रखेलप्रमाणे रहावे लागणार होते! नंदिनीने एक निर्णय घेऊन मनाशी पक्के ठरविले. ताई आणि दाजींकडून तिने वचन घेतले की, मूल झाल्यावर ती काय मागेल ते तिला मिळेल. त्या दोघांनीही आनंदाने तिला वचन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यथावकाश नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ताई आणि दाजी हरखून गेले. ताई बाळाला आपल्याकडे नेण्यास आली, तेव्हा नंदिनीने दोघांना तिच्या वचनाची आठवण केली. दोघेही बोलले, ' तुला काय हवं ते माग '.

नंदिनी बोलली, " कपटाने तुम्ही दोघांनी मूल होण्यासाठी माझा वापर केला. माझ्या प्रेमाचा बळी गेला. घराला वारस हवा म्हणून माझं जीवन बरबाद केलं. बाहेरच्या जगात आता मला कवडीची किंमत नाही. माझ्या आईवडिलांनी आणि मोठ्या बहिणीने माझा कुठलाही विचार केला नाही. पण मला रखेल म्हणून जगायचं नाही. मला तुमच्या धर्मपत्नीचा दर्जा हवा आणि माझ्या मुलावर केवळ माझाच हक्क राहील. ताईचा तिच्या संसारात अधिकार कायम राहिला तरी मी रखेल म्हणून राहणार नाही."

नंदिनीचे शब्द ऐकून दोघांनाही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. दोघांनी वारसाच्या हव्यासापोटी डोळ्यांवर पट्टी बांधली होती. भलं - बुरं कसलाही विचार केला नव्हता. आणि कोवळ्या पोरीचं आयुष्य कुस्करून टाकलं. नंदिनीला राणासिंगच्या धर्मपत्नीचा दर्जा मिळाला आणि तिचे मातृत्वही अबाधित राहिले.

 

 

3 comments:

  1. जाणून बुजून फसवणूक करणारे एवढे हवालदिल होऊन शरमतात हे देखील एक महत्वाचे वळण आहे। अभिनंदन!

    ReplyDelete
  2. Sorry.. But I didnt like it. It sounds like marry the rapist.

    ReplyDelete