आश्वासक चित्र

गेली पाच-सहा वर्षे मी इयत्ता दहावीला मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवयित्री 'नीरजा 'यांची 'आश्वासक चित्र' ही कविता शिकवते. मुलाचं चेंडू खेळणे ,मुलीचं भातुकली खेळणं, बाहुलीला झोपवणं आणि त्याच सफाईनं चेंडू उंच उडवून झेलणं. मुलाला मात्र दोन्ही गोष्टी एकदम करताना करावी लागणारी कसरत ,पण मुलगाही प्रयत्न करतो- एकाच वेळी बाहुलीला सांभाळणं आणि स्वयंपाक करणं ही कौशल्य साधण्याचा !
शेवटी नीरजा म्हणतात -
"हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. 
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं 
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही 
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं." 

मी या कवितेचे अभिवाचन करते आणि मग त्यावर काही सूचक प्रश्न विचारून चर्चा घडवून आणते. पहिला प्रश्न असतो- ' तुम्ही घरात कोण कोणती कामं करता? प्रश्न मुलगे आणि मुली दोघांसाठीही असतो. सुरुवातीची दोन-तीन वर्षे या प्रश्नाची उत्तरे ठराविक होती. मुली घरातली जवळपास सगळीच कामं करतात. पाणी भरणे, झाडलोट, भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे सगळीच कामे मुली करतात. मुलं सांगत - मी दुकानावरून काही आणून द्यायचं असेल तर आणून देतो. क्वचित कोणी मुलगा दळण आणतो आणि चहा करता येतो. गेल्या दोन-तीन वर्षात मात्र ही परिस्थिती बदललेली दिसते. वर्गातल्या वीस-बावीस मुलांपैकी जवळजवळ सतरा-अठरा मुलांना बेसिक स्वयंपाक येतो. मुलं पाणी भरतात, आई कामाला गेल्यावर शाळेत येण्याआधी घर झाडतात, धाकट्या भावंडांना जेवण वाढतात. हे बदललेलं आश्वासक चित्र काही प्रमाणात तरी सुखकर वाटतं. याचा अर्थ सगळं चित्र बदललेलं आहे का? तर अजिबात नाही.

मुलींची शिकण्याची वाट अजूनही म्हणावी तेवढी सोपी नाही .कौटुंबिक अडचणी, आर्थिक समस्या उभी राहिली तर पहिली गदा येते मुलींच्या शिक्षणावर. घरातलं कोणाचं आजारपण, पाहुणे येणार असतील तर, आईला कामात मदत करण्यासाठी, आई कुठे कामाला किंवा बाहेरगावी गेली तर धाकटे भावंड सांभाळणं अशा वेळी शाळा बुडवून मुलींनी घरी राहणे गृहीत धरलं जातं .मुलगी लहान असो की मोठी तिच्यावर त्या जबाबदारीचं ओझं तिच्या संमतीशिवाय येऊन पडतं. 
तिसरी -चौथी मधल्या मुलींना आईच्या अनुपस्थितीत जेवण बनवायला घरी राहावं लागतं हे आम्ही बघतो. चौथीत असलेल्या स्वप्नाला आणि तिच्यापेक्षा एखाद्या वर्षांनी लहान असलेल्या भावाला चौदा पंधरा वर्षांच्या 'काका’च्या भरवशावर सोडून आई उत्तर प्रदेशातल्या गावी गेली होती. एकदा तिच्या हातावर मोठी भाजल्याची खूण दिसली . काय झालं हे विचारल्यावर त्या चिमुरडीने सांगितले , " चाचा रोटी बनाता है, और मै सेकती हुं, मै रोटी सेक रही थी तब ये हुआ" हीच स्वप्ना दहावीत असताना आई तिचं लग्न करण्याच्या गोष्टी करायला लागली होती. नेहमी हसती खेळती स्वप्ना वर्गात शांत बसायला लागली तेव्हा ही गोष्ट आम्हाला कळली .स्वप्नाची आई खरं तर खूप अॅक्टिव्ह पालक. तिला मी आमच्या शाळेची ब्रँड अँबेसिडर म्हणते. कारण कोणतंही इतर प्रांतीय कुटुंब आलं की त्या मुलांना पालकांना ती स्वतः शाळेत घेऊन येते. ' बच्चों को अच्छा सिखाते है, इधरही डालना' वगैरे शिफारस करते. तिच्या डोक्यात स्वप्नाची शादी करायचं वेड आलं होतं आणि म्हणून सपना उदास झाली होती. अभ्यास, खेळ सगळ्यात हुशार असलेल्या स्वप्नाला पुढे शिकायचं होतं. मग तिच्या आईला एक दिवस शाळेत बोलावून घेतलं. अठरा वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करणे हा गुन्हा आहे. स्वप्ना हुशार आहे, ती शिकली तर तुम्हाला तिचा अभिमान वाटेल ,आधार होईल हे समजावून सांगितलं. तिचं म्हणणं होतं, " हमारे यहा बिरादरीवाले बोलते है की लडकी 15 बरस की हो गई तो भी शादी करनी चाहिए, पढके क्या करेगी ?" हे बिरादरीवाले नंतर स्वप्नाच्या आयुष्यातलं भलंबुरं पाहायला येणार नाहीत, हे तिला पटवून दिलं. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे असं तिने कबूल केलं; तरी भरवसा नव्हता खरं तर, पण स्वप्ना यावर्षी बारावी पास झाली आणि ती पुढे शिकणार म्हणते आहे!
शाळेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी तर आमच्या शाळेत येणारी मुले मुली अगदी ग्रामीण भागातली होते. जवळपास सगळीच दहावीपर्यंत शिकणारी पहिली पिढी होती. तेव्हा हर्षलानी आमच्या शाळेत आठवीत प्रवेश घेतला. मूळच्याच स्मार्ट असलेल्या हर्षलाच्या अभ्यास, वक्तृत्व ,लेखन या गुणांना शाळेत छान पैलू पडले. तिने अलिबागमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि तेव्हा तिच्या मनात पत्रकारितेच्या शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण झालं . फारसं न शिकलेल्या, बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या हर्षलाच्या आई-वडिलांनी मुलीवर विश्वास आणि आमच्यावर भरवसा ठेवला. हर्षदाला पुण्याच्या रानडे इन्स्टिट्युट या नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कुरूळसारख्या छोट्याशा खेड्यातून पुण्यात जाऊन हर्षलाने जिद्दीने पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. गेली चौदा-पंधरा वर्षे हर्षला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या केंद्र सरकार अंगीकृत कंपनीत पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून उत्तम काम करते आहे.

अशाच आर्थिक, शैक्षणिक पार्श्वभूमीमधून पुढे जाऊन प्रेरणा आणि प्रणाली या भगिनी इंजिनियर होऊन चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतायत. स्मिता ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात तर प्रतीक्षा नवी मुंबईत मोठ्या खाजगी रुग्णालयात सीनियर नर्स म्हणून काम करत आहेत. विद्या हैदराबादमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर आहे.

या झाल्या काही यशोगाथा. पण सगळ्याच मुलींचे अनुभव असे आहेत का? तर दुर्दैवाने याचे उत्तर 'नाही' असे आहे.

शाळेत नवीन प्रवेश चालू होते . एक आई मुलांना घेऊन आली होती. आठवीतला मुलगा आणि पाचवीतली मुलगी. दोन्ही मुलं छान चुणचुणीत. मुलांनी दाखले, नोंदपुस्तिका मागवून घेण्यासाठी तिकडच्या शिक्षकांचा मोबाईल नंबर , शाळेचा पत्ता अगदी व्यवस्थित सांगितला. यवतमाळ जवळच्या एका आश्रमशाळेत दोन्ही मुलं शिकत होती. प्रवेश अर्ज भरताना मी मुलांच्या आईला विचारलं की एवढ्या लांब कशा आलात?

जुनाट , मळकी साडी नेसलेली , काळ्यासावळ्या रंगाची , गळ्यात साधी काळी पोत घातलेली ती बाई तेवढंच विचारल्यावर भडाभडा बोलायला लागली. "काय करणार बाई, सहा वर्षांपूर्वी नवरा गेला. या दोन पोरांना तिकडे शाळेत ठेवलं होतं. पन म्या इकडं काम करते. मला तिकडं जायला जमत न्हाई. तवा आनली इकडं. या वर्शी म्होठ्या पोरीचं लगीन लावून दिलं.’’

" केवढी आहे मोठी पोरगी ? " मी विचारलं.

" दहावी पास झाली बगा. यावर्षी अकरावीत गेली असती"

" अहो, पण एवढ्या लहान वयात कसं लग्न करून दिलंत ? अठरा वर्षाची होईपर्यंत मुलीचं लग्न करता येत नाही कायद्याने ." आता सांगून काही उपयोग नाही हे कळूनही मी सांगितलं.

" काय करायचं बाई , जग चांगलं न्हाई हो . म्या एकटी बाई .कामामागं फिरनार. वयात आलेली पोरगी कुटं ठेवायची सांगा ? करून दिलं लग्न. नणंदेच्या पोरालाच दिली. माज्या जीवाचा घोर गेला बाई ! "

यावर मी काहीही बोलू शकले नाही. शिक्षणाच्या प्रवाहातून मुली अशाही बाजूला होतात.

7,8 वर्षांपूर्वी चुणचुणीत सविता शाळेत आली. आईवडील नाहीत म्हणून बहिणीकडे राहात होती. सविता नववीत गेली आणि शाळेत येईना म्हणून चौकशी केली तर तिचं लग्न करून दिलंय असं कळलं. नंतर तिच्या वर्गातल्या मुली तिचा सासरी खूप छळ होतो असं सांगायला लागल्या. आमचा मात्र तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही. पुस्तकं वाचायला आसुसलेली सविता, '१५ ऑगस्टला माझा वाढदिवस असतो, पण मला कोण नवा ड्रेस घेणार? असं म्हणणारी सविता, नवा ड्रेस घेऊन दिल्यावर चेहऱ्यावर निखळ हसू घेऊन दिवसभर शाळेत बागडणारी सविता, नजरानजर झाली की शब्दांशिवाय भावुक डोळ्यांनी बोलणारी सविता .... काय करत असेल आता? संसाराचं ओझं वाहत असेल? कामाच्या ओझ्याखाली पिचली असेल? नवऱ्याचा मार, छळ सहन करत निमुटपणे आसवं गाळत असेल? आणि या सगळ्याबद्दल तक्रार तरी कोणाकडे करेल तो अगतिक जीव? आम्ही काहीच करू शकलो नाही, या हतबलतेची, असहायतेची टोचणी मनाला सतत बोचत राहते. सविताच्या आठवणीने डोळे भरून येत राहतात.

शाळेच्या प्रवासातल्या सगळ्याच गोष्टी काही सुंदर, यशाच्या, उमलत्या फुलांच्या नाहीत. काही अशा आमच्या अपयशाच्या, मनाला कायम टोचणी लावणाऱ्याही आहेत. पण आमच्या या अपयशाने एका कळीचं फुलणं खुरटलं, एक कोवळं आयुष्य अकाली करपलं याची खंत कधीच पुसली जाणार नाहीये.

या सगळ्या मुलींचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येकीचा स्वतःचा संघर्ष होता, आहे. पण मुलींच्या अंगातच झगडण्याची ताकद असते असं मला वाटतं. प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या कोणत्याही शिक्षकांना विचारलं तर बहुसंख्य शिक्षक सांगतील, इतक्या अडचणींवर मात करूनही शालेय शिक्षण आणि पूरक उपक्रम यात मुली अग्रेसर असतात.
काही मुली वर लिहिलंय त्या रूढार्थाने यशस्वी झाल्या. पण सगळ्याच जणी यशस्वी झाल्या नसतील किंबहुना एका यशस्वी कहाणीमागे एक अपयशाची कहाणी असेही प्रमाण असेल. पण तरीही मुली हरत नाहीत, त्या जिद्दीने आयुष्यभर कष्ट करतात ,जमेल आणि सुचेल त्या मार्गांनी संसार, जगणं सुंदर होईल यासाठी प्रयत्न करतात आणि आपल्या मुलांना मात्र चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आग्रही असतात. कधी तरी कुठे तरी भेटतात, तेव्हा शाळेतल्या दिवसांबद्दल भरभरून बोलतात आणि कडेवर हाताशी मूल असेल तर त्यांना कौतुकाने सांगतात," आमच्या मॅडम बरं का या! त्यांच्यामुळे आम्ही घडलो !" त्यावेळी मुलींच्या कौतुकाने मन आणि डोळे भरून येतात.

सुजाता पाटील, 

मुख्याध्यापिका, 
सु.ए.सो माध्यमिक विद्यालय, 
कुरूळ - अलिबाग.

पाठ्यपुस्तकातील लिंगभाव

शालेय शिक्षणात पाठ्यपुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाठ्यपुस्तकांचा साध्य ते साधन हा प्रवास गेल्या काही काळात बराच पूर्ण झाला आहे. पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातूनच अनेक जण आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करू शकतात. खरंतर गुरूनंतर पाठ्यपुस्तकेच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांवर वाचनसंस्कार होण्यासाठी देखील पाठ्यपुस्तके महत्वाची भूमिका निभावतात. विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले तरी मागील वर्षांची पुस्तकेही त्यांच्या मनात घर करून असतात. अमुक इयत्तेला मला अमुक पुस्तक होते, त्यावरचे मुखपृष्ठ, त्यातल्या कविता, धडे याचीही अगदी प्रेमळ आठवण पुढे कित्येक वर्षे काढली जाते. पाठ्यपुस्तकातून अनेक सांविधानिक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाऊन भावी नागरिक घडवण्याचे काम ते करत असतात. कदाचित याच उद्देशाने काही वर्षांपूर्वी 'मूल्यशिक्षणा'स शाळेच्या वेळापत्रकात स्थान दिले गेले होते. पाठ्यपुस्तकातही ही मूल्ये असणे अपेक्षित असते. त्या मूल्यांपैकी 'स्त्री-पुरुष समता' या मूल्याचा अभ्यास करताना मुलांकडून अनेक मुद्दे चर्चिले जातात. अनेकदा मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक त्यातून अधिक स्पष्ट होते. एकाच शाळेत जाणाऱ्या एका घरातल्या बहीण-भावाच्या बाबतीतही नकळतपणे दुजाभाव केला जातो. खेळाच्या सरावाला मुलाला पाठवले जाते; परंतु मुलीला मात्र मज्जाव असतो. मुलांच्या अभ्यासाबाबत जागरूक असलेले पालक मुलींच्या अभ्यासाबाबत मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून वागतात. तेव्हा मला एक शिक्षक म्हणून प्रश्न पडू लागला की शिक्षणामुळे परिस्थिती बदलते म्हणतात, पण सुशिक्षित घरांमध्येही अशीच परिस्थिती असेल तर दोष कोणाचा? 

ज्या शिक्षणामुळे माणूस घडतो त्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या पाठ्यपुस्तकांमध्येच मुलामुलीतला भेदभाव दिसून येत असेल तर सर्वसामान्य घरातील वागणुकीमध्ये वावगे काही असे वाटणारच नाही. पाठ्यपुस्तकांत देखील जर असाच उल्लेख व मजकूर असेल तर नव्याने घडणाऱ्या पिढीत हा लिंगभेद जास्त तीव्र स्वरूप धारण करेल. शिक्षणात पाठ्यपुस्तके ही प्रमाण मानली जातात. पाठ्यपुस्तक मंडळाने विद्यार्थ्यांना सहज आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून पहिली ते दहावीची पुस्तके रंगीत, चित्रमय व अधिक आकर्षक केली आहेत ही बाब खरंच अभिनंदनीय आहे. पुस्तकात शब्दांच्या बरोबरीने चित्रेही महत्त्वाची असतात. एक चित्र हजार शब्दांचे काम करते असे म्हणतात. पाठ्यपुस्तकातून आदर्श चित्रे समोर आल्यास त्याचा नक्कीच पुढील पिढीवर सकारात्मक परिणाम होईल असे वाटते. पण ही पाठ्यपुस्तके सहज चाळली तरी जवळपास 80 टक्के चित्रे ही मुलग्यांची दिसून येतात. अशा चित्रमय पुस्तकांतून विद्यार्थ्यांना काय आकलन होईल? त्यांच्या मनावर काय परिणाम होईल? 
उदाहरणादाखल प्रथम भाषा मराठी असलेल्या इयत्ता सातवीच्या पुस्तकाचा आढावा घेऊया. ह्या पुस्तकामध्येही जास्तीत जास्त चित्रे मुलांचीच आहेत. 'स्वप्न विकणारा माणूस' या पाठांतर्गत चित्रात स्वप्न विकणाऱ्याच्या भोवती बहुतांश पुरुषच आहेत.(अपवाद एका स्त्रीचा अर्धवट दिसणार चेहरा ) याच पाठाच्या सुरुवातीला “तुम्ही काय कराल” ह्या भागात तिन्ही चित्रे पुरुषांचीच आहेत. त्या चित्राखाली लिहिले आहे - 'तुम्ही चांगले धावपटू आहात. शाळेच्या क्रीडासंमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे, हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल?'. हे वाचून एक मुलगी म्हणाली, "बाई, खेळाडू होण्याचं आमचं स्वप्न असू शकत नाही का? आमच्या शाळेचे त्यामुळे नाव होणार नाही का? आणि तसे असेल तर चित्रांमध्ये फक्त मुलेच का? आपल्या कोमलताईने(कोमल देवकर) तर शिवछत्रपती हा मोलाचा क्रीडा पुरस्कार मिळवून आपल्या शाळेचेही नाव उंचावले आहे. असे असताना या चित्रात तीनही मुलगेच कसे?" या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे हे अजूनही माझ्या लक्षात आलेले नाही! 

इयत्ता सहावी नागरिकशास्त्रातील पाठात पुरुष पोलीस अधीक्षक सर्व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करत आहेत, असे चित्र आहे. खरंतर पुस्तकातील चित्रे पाहूनही अनेक मुले भविष्यातील ठोकताळे बांधत असतात. अशीच एक रेल्वेपोलीस म्हणून सेवेत असणारी विद्यार्थिनी एका कार्यक्रमानिमित्त शाळेत आली होती. तेव्हा ती पटकन म्हणाली की, “बाई, आताही पुस्तकात पोलिसाच्या वेषात पुरुषच असतील तर हे क्षेत्र खऱ्या अर्थाने मुलांचेच आहे - हा सगळ्यांचा गैरसमज पक्का होऊ शकतो.” ही खंत व्यक्त करत असताना स्वतःच्या यशाला असलेली दुःखाची किनार तिला लपवता आली नाही. ती म्हणाली की, “कबड्डी खेळाडू म्हणून पोलीस सेवेत प्रवेश सोपा झाला. पण माझ्या जीवनात साथीदाराचा प्रवेश मात्र सोपा नाही असे वाटते. एक खेळाडू मुलगी आणि वर ती पोलीस ही गोष्ट लग्नाळू मुलांना पचत नाही. त्यामुळे माझ्याशी लग्न करायला कोणी तयार होत नाही.” ते ऐकून खूपच वाईट वाटले.
याच पाठासोबत दिलेल्या व्याकरणाच्या अभ्यासात जी वाक्ये दिली आहेत त्यातली ही वाक्ये पहा – 

रेश्मा पालीला घाबरते. 
रवी पालीला मारतो. 
या आणि अशा वाक्यांतून समाजातल्या साचेबंद लिंगभेदी प्रतिमाच दृढ होण्याची शक्यता वाढते.

सातवीच्या जुन्या मराठी पुस्तकात 'डोंगरी शेत' या कवितेतील स्त्री शेतातील सर्व कामे करताना दाखवली आहे. ही कामे करताना तिचा जीव दमला आहे. तिला ती सगळी कामे झेपत नाहीत. पण तरी ती करत रहाते. याचा अर्थ स्त्रियांनी जमणारी, न जमणारी सगळी कामे केली पाहिजेतच असा देखील होऊ शकतो. अशावेळी शिक्षक त्याचा कसा अर्थ लावून सांगतात, कशी चर्चा घडवून आणतात, यावर बरंच काही अवलंबून राहते. ही कविता शिकवत असताना शेतात राबणाऱ्या बाईसंदर्भात चर्चा रंगात आली होती आणि त्याच वेळी एका सिनेमाचा उल्लेख एका मुलाने केला. 'सैराट' नावाचा मराठी सिनेमा चित्रपट त्या काळात तरुणाईमध्ये धुमाकूळ घालत होता व चित्रपटातील नायिका धीट असल्यावरून तीही बहुचर्चित होती. ट्रॅक्टर घेऊन ती शेतात जाते, बुलेट चालवते तर मग शहरातील मुलीपण हे करू शकतात ना? हा मुलींचा भाबडा प्रश्न होता. त्या अनुषंगाने अधिक चर्चा होऊ लागली. आणि गावातली स्त्रीपण आर्चीसारखी दाखवली गेली तर किती छान असे सगळेच म्हणाले. शिवाय चित्रपटातील दोन तरुणांचे निर्णय कसे चुकीचे होते यावरही त्यांचे एकमत झाले. या सर्व चर्वितचर्वणानंतर कवितेतील बाई व वास्तवातील बाई वेगळी नाही असे सर्वांचे मत झाले. 
पण वास्तवात जरी अनेकदा महिला घराबाहेर काम करताना आपण पहात असलो तरी पुस्तकात मात्र महिला घरातली कामे करतानाच दाखवली जातात आणि घराबाहेरच्या सार्वजनिक ठिकाणी पुरुष, मुलगे दाखवले जातात. उदा. सातवीच्याच पुस्तकात 53-54 पानांवर इतकी चित्रे आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणांच्या ह्या चित्रात एखादी तरी महिला दिसते का? पाठ्यपुस्तकांच्या चित्रांचे चित्रकार दोन-तीन अपवाद सोडल्यास तिथेही पुरुष चित्रकारांचीच संख्या जास्त असते. महिलांची चित्रे पाठपुस्तकांत कमी असण्याचे हे देखील कारण असेल का?
वर्गात खरं तर मुलगा-मुलगी भेदभाव याबाबत अशी चर्चा बऱ्याच वेळा होते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकाच घरातील बहीण-भावाचा दिनक्रमही कसा वेगळा असतो आणि शिकवत असताना पाठ्यपुस्तकातही असाच उल्लेख येतो, तेव्हा मात्र मुलींना खात्रीच पटते की आपले आणि मुलांचे जीवन हे पूर्णतः वेगळे आहे. 
मराठी धडे व कविता याशिवाय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी 'विचारधन' विभागाचा पाठ्यपुस्तकात अंतर्भाव आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये सगळे 'विचारधन' हे महापुरुषांचे आहे ! अनेक स्त्रियानी मराठी साहित्यात मोलाची भर  घातली आहे. तरीही महान विचार असणारी एकही स्त्री पाठ्यपुस्तक मंडळाला सापडली नाही याचे आश्चर्य वाटते. हीच गोष्ट पाठांच्या लेखकांबाबतही दिसते. सातवीच्या मराठीच्या पुस्तकाची अनुक्रमणिका  पाहिली तर 21 पैकी 6 पाठ स्त्रियांनी लिहिले आहेत. ‘थोरांची ओळख - डॉ. खानखोजे’ हा पाठ वीणा गवाणकर यांच्या ‘डॉ. खानखोजे - नाही चिरा.. ’ ह्या पुस्तकातला उतारा असला तरी अनुक्रमणिकेत पाठाच्या लेखिकेचे नावच न लिहिल्यामुळे ‘थोरांची ओळख’ हा पाठ डॉ. खानखोजे यानी लिहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो. इयत्ता आठवीच्या पुस्तकात १४ पैकी ४ लेखिका आहेत; इयत्ता नववी च्या पुस्तकात१८ पैकी ६ आणि दहावीच्या पुस्तकात १६ पैकी २ लेखिका आहेत. आठवी ते दहावीच्या प्रथम भाषा मराठीत 'काही पूरक पुस्तके व संदर्भ ग्रंथ’ यांच्या यादीतही स्त्री साहित्यिकांना जेमतेम स्थान आहे. पाठ्यपुस्तक मंडळ अभ्यासगट, तज्ज्ञ समिती यातील सदस्यांबाबतही स्थिती वेगळी नाही. जरी ‘स्त्री-पुरुष समता’ हे एक महत्त्वाचे मूल्य मानले जात असले तरीही आपल्यावरच्या विषमतेच्या संस्कारांना आपण मोठ्यामाणसांनीच अजून पूर्णत: पुसून काढलेले नाही. त्यामुळे अनेकदा आपल्यात रुजलेली विषमता आपल्या नकळत काम करते, तसेच पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीच्या बाबतीत होत असावे.

आता ही पहिलीतीलच कविता पहा - ‘आई मला दे ना’ 
मुलं आईकडे काय काय वस्तू मागतात, ते कवितेत सांगितले आहे. खरंतर ही कविता शिकवताना मुलगा किंवा मुलगी आपापल्या आवडीची कुठलीही कामं मोकळेपणाने करू शकतात, अशी शिकवण देता येणे सहज शक्य आहे. पण कवितेचे शब्द आणि सोबतची चित्रे दोन्हींचा ताळमेळ घातला तर काय दिसते आहे? ‘आई मला छोटीशी बंदूक दे ना, बंदूक घेईन शिपाई होईन’ असे मुलगा म्हणतो आणि मुलगी काय करेल? तर ती बाहुलीला सजवून तिच्या बरोबर खेळत राहील! बंदुकीशी खेळणारी मुलगी आणि बाहुलीशी खेळणारा मुलगा शालेय पुस्तकातल्या चित्रात दिसावा ही फारच जास्त अपेक्षा आहे का? 
एकीकडे पालक आणि शिक्षक दोघांनीही ‘स्त्री-पुरुष समते’ चे मूल्य अंगिकारायला पाहिजे आहे. त्याच बरोबर पाठ्यपुस्तकातले शब्द आणि चित्रेसुद्धा समतेच्या जाणिवेला पूरक असली पाहिजेत. पाठ्यपुस्तकांनी एकूण मजकूर व आकर्षकता याबाबतीत कात टाकली आहे. आता लिंगभेदाच्या बाबतीतही अधिक जागरूकता बाळगली तर ती आदर्श ठरतील हे नक्की!

राजश्री साळगे

शिक्षिका, नंदादीप विद्यालय, गोरेगाव, मुंबई. 
सम्यकसंदेश मासिकात पुस्तकपरिचय, 
‘मैत्री पुस्तकाशी’ ह्या युट्यूबचॅनलच्या माध्यमातून 
शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परिचय व अभिवाचन

शालेय वातावरणातील लिंगभाव


केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातल्या एका सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींचे शॉर्ट्स परिधान केलेले फोटो नुकतेच पाहण्यात आले. त्यात स्वातंत्र्याच्या भावनेचा आनंद लुटणार्‍या मुली धावत आहेत, खेळत आहेत असे दिसते आहे. त्या म्हणतात, “पूर्वी आम्ही खेळायचो तेव्हा स्कर्ट आमची शारीरिक हालचाल मर्यादित करायचा. आता हे नवीन शॉर्ट्स अधिक आरामदायक आहेत आणि मुलांप्रमाणे आमच्याकडेही खिसे आहेत.’’
लिंगाधारीत भेदभाव हटविण्याच्या प्रयत्नात, या शाळेने नुकताच निर्णय घेतला की सर्व प्राथमिक विद्यार्थी शर्ट आणि ट्राऊजर्स घालतील तर पूर्व-प्राथमिक वर्गात टीशर्टस् आणि शॉट्स असतील. तिथे शाळेतल्या मुलांना एक नवीनच जाणीव झाली, “मुली आता आमच्यापेक्षा वेगाने धावतात कारण त्यांना धावताना स्कर्ट धरून ठेवण्याची गरज नसते.”
स्त्रियांचा पेहराव हा त्यांच्या गतिशीलतेवर मर्यादा आणणारा असतो, असे मत सिमॉन दि बोव्हुआर यांनी व्यक्त केलेले आहे आणि शालेय मुलींनाही ते लागू होते.
शाळेच्या गणवेशाचं उदाहरण जरी घेतलं तरी मुलांसाठी शर्ट आणि हाफपॅन्ट किंवा पुढे नववीदहावीला फुल पॅन्ट असे सुटसुटीत कपडे असतात. तर मुलींना शर्ट आणि त्याला जोडलेला बॉडीफ्रॉक असतो - जो मुलींच्या बसण्या उठण्यात , खेळण्यात अगदी लहान वयापासूनच अडथळा आणतो. कारण मुलींना लहानपणापासूनच आपले पाय, मांड्या झाकून ठेवण्याची सवय लावली जाते. मुलींचा बॉडीफ्रॉक हा सगळीकडून मोकळा असल्यामुळे बसताना, खेळताना अंतर्वस्त्र दिसू नये याची मुलींनी पुरेपूर काळजी घ्यावी, असाही एक अलिखित नियम असतो. लहान मुलांपासून मोठ्या मुलींपर्यत अशा बाबतीत तोंडाला हात लावून 'अव्वा गडे' 'इश्य गडे' असे म्हणत लाजवण्याचे, हिणवण्याचे प्रकार जवळपास सर्वच शाळांमध्ये रूढ झालेले दिसतात. असे काही लाजिरवाणे प्रकार घडल्यास दिवसभर त्या मुलीच्या मनात ती घटना, त्या आठवणी घर करून राहतात. वाचण्या लिहिण्यापासून त्यांचे लक्षही विचलित होते. पण कधीही या गोष्टी मोडीत काढण्याचा प्रयत्न झालेला दिसत नसे. सुमारे तीसपस्तीस वर्षांपूर्वी तर मुलींना शाळेत येताना अगदी पायघोळ पेटीकोट आणि फुल स्लिव्ह असलेलं शर्ट वापरावं लागत असे. मागच्या पिढीत वयात आलेल्या मुलींना शाळेचा गणवेश म्हणून साडी नेसावी लागत असे. दोन वर्षांपूर्वी हैद्राबादेतील एका कॉलेजमध्ये मुलींच्या सलवारकमीजच्या कमीजची लंबी किती असावी यावर निर्बंध लादले गेले होते. त्याविरुद्ध तिथल्या मुलींना संघर्ष करावा लागला होता.
कपडे हे थंडी, उन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी असतात. ते सरकले , चुरगळले किंवा अंतर्वस्त्र दिसले तरी काही हरकत नाही, हे सांगण्याऐवजी उलट मुलींनी बॉडीफ्रॉकच्या आत आणखी लेगीन, चुडीदार वापरावे व शक्यतोवर जास्तीत जास्त झाकझूक करून अदबीने रहावे, असेच धडे दिले जातात. मराठी,हिंदी,उर्दु, इंग्रजी ग्रामीण-शहरी अशा सगळ्यात शाळात असा भेद पाहायला मिळतो. या गोष्टीचा परिणाम मुलींच्या मानसिकतेवर व पर्यायाने शिक्षणावरही होतोच. त्यापेक्षा मुला-मुलींना सारखाच गणवेश दिला तर अशा सगळ्या छोट्या समस्या संपुष्टात येतील. मुलींच्या शरीररचनेचा विचार करता फार तंग गणवेष न वापरता सरसकट सगळ्यांनाच सुटसुटीत असलेला सारखा गणवेष सक्तीचा केला तर या बाबतीत मुलामुलीत सारखेपणा येईल – अशा विचाराने दिल्लीतील आणि गुरुग्राम मधील काही शाळांनी देखील असा पर्याय निवडला आहे. लंडन, मेक्सिको, स्वीडन अशा ठिकाणी देखील असे बदल होत आहेत. हे बदल नक्कीच स्वागतार्ह आहेत. तरीही फक्त कपड्यांच्याच नव्हे तर शाळेतील मुलामुलींच्या इतर वर्तणुकीच्या बाबतीतही केला जाणारा भेदभाव हा मुलींच्या शैक्षणिक, मानसिक विकासात अडथळा ठरत असतो.
शाळेतले वातावरण, शाळेचे नियम, अभ्यासक्रम, खेळ, शिक्षा, छंद या सगळ्याच गोष्टींमध्ये लिंगभेद केला जातो. अगदी लहान वयात म्हणजे बालवर्गापासून चौथीपर्यंत मुलं-मुली वर्गात एकत्र बसतात, खेळतात. पण पाचवीपासून मुलं आणि मुलींना वेगवेगळं बसवण्यापासून ही सुरुवात होते. अभ्यासक्रमातले छोटे-छोटे उपक्रम देतानाही नजाकतीचे किंवा स्वयंपाकघराशी निगडित उपक्रम मुलींना दिले जातात तर वैज्ञानिक, मेहनत घेऊन करण्याचे, धाडसाचे उपक्रम जाणीवपूर्वक मुलांना दिले जातात.
मध्यंतरी मी एकदा एका नामांकित महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेले होते. तिथे होम सायन्सच्या विद्यार्थिनी काहीतरी उपक्रम करत होत्या. वेगवेगळी पाककृती बनवणे, त्यासाठी लागणारे बारकावे, कौशल्य आत्मसात करणे, एखादी पाककृती बनवल्यानंतर ती सुशोभित करण्याचे कसब शिकून घेणे, त्याचबरोबर एम्ब्रॉयडरी, फॅशन डिझायनिंग अशा विविध गोष्टी शिकणाऱ्या मुली पाहताना वाटलं की त्या घरी जे करतात तेच इथेही येऊन करतात. म्हणजे मुलींना पारंपरिक चौकटीत राहण्याचे, “आदर्श” स्त्री बनण्याचेच शिक्षण ही संस्था देत होती. अर्थातच, अशा प्रकारचं प्रशिक्षण घेण्यासाठी तिथे एकही मुलगा नव्हता. जवळ जवळ सर्वच महाविद्यालयात जिथे होमसायन्स हा विषय असतो, तिथे शंभर टक्के मुलींचीच उपस्थिती असते. त्यांना प्रशिक्षण देणारीही स्त्री शिक्षिकाच असते. अशा विषयात प्रवेश घेणारे मुलगे अगदी अपवादानेच दिसून येतात. ज्याप्रमाणे घरात मुलींना बाहुल्या आणि भातुकली खेळायला दिली जाते आणि मुलांना बंदूक आणि ट्रक सारखी वाहने खेळणी म्हणून दिली जातात – त्याचेच हे शैक्षणिक वातावरणातले प्रतिबिंब म्हणावे लागेल.
शाळेतही डिश डेकोरेशनच्या स्पर्धांमध्ये मुलींचीच नावं अधिक घेतली जातात. तर लांब उडी, उंच उडी, एरोबिक प्रात्यक्षिक, मैदानी खेळात बहुतेक मुलांची नावे घेतली जातात. वर्गात शिक्षा देतानाही मुलांना कोंबडा बनवून ठेवणे, तर मुलींना कान धरून उभे करणे, मुलांना रिंगणात, मैदानात दहा चकरा मारत पळायला लावणे तर मुलींना हातावर दोन छड्या मारून जागेवर बसवणे, अशा शिक्षा दिल्या जातात. अशा भेदभावपूर्ण स्पर्धा आणि शिक्षा मुलींच्या मनात आपण नाजुक आहोत, कमकुवत आहोत अशी भावना तर मुलांच्या मनात आडमुठेपणाची, दांडगाईची एक भावना रुजवतात.
शारीरिक शिक्षणाच्या तासालाही मुलगे मैदानी खेळ खेळत असतात. खेळासाठी लावलेल्या साधनांचा पुरेपूर उपयोग करत भरपूर दंगामस्ती करत असतात, तर मुली कुठेतरी बाजूला बसून गप्पा मारत असतात किंवा लगोरी, गाण्याच्या भेंड्या खेळत असतात. मराठी असो वा इंग्रजी, ग्रामीण असो वा शहरी - कोणताही शिक्षक वा शिक्षिका मुलींना मनमोकळे मैदानी खेळ खेळण्यास सहसा प्रोत्साहित करत नाहीत. हल्ली याला काही अपवाद असू शकतात, पण साधारणतः मुलगा हा ‘पुरुषी’ घडावा आणि मुलगी ही ‘बायकी’ घडावी याकडेच शाळा-कॉलेजात प्रकर्षाने लक्ष पुरवलं जातं. यात जाणीवपूर्वक बदल घडवणे गरजेचे आहे.
सुमारे २०० वर्षांपूर्वी इंग्रजांनी भारतात जी जुजबी शिक्षणपद्धती सुरू केली त्यावर दीर्घकाळ फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. स्त्रियांनीही शिक्षण घेतले पाहिजे, हा विचार सुद्धा भारतातल्या पुरुषांच्या मनाला शिवला नव्हता. अशा काळात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजातल्या धर्ममार्तंडांनी या दांपत्याला ही शाळा बंद व्हावी आणि मुलींना शिक्षण घेता येऊ नये, यासाठी हरप्रकारे त्रास दिला. तरीही नेटाने त्यांनी हे काम चालूच ठेवले. म्हणूनच आज स्त्री बाहेर पडू शकली. यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले, समाजाचा विरोध पत्करून अवहेलना सोसली त्याचे फलित आज स्त्रीचा समाजातला शैक्षणिक स्तर आहे, असे आपण म्हणू शकतो. पण ही शिक्षण घेण्याची जी प्रक्रिया आहे ती समाजातल्या कोणत्याही पुरुषाने शिक्षण घ्यावे इतकी सहज आणि सोपी मात्र नक्कीच नाही. जितक्या सहजपणे कुटुंबातला एक मुलगा त्याला हवं ते शिक्षण घेऊ शकतो, तेवढ्याच सहजपणे एक मुलगी अजूनही घेऊ शकत नाही. जात, वर्गनिहाय यात थोडाफार वेगळेपणा असू शकेल. म्हणजे उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी स्वतःच्या पायावर उभे राहण्याइतपत शिकू शकते आणि काही अपवादात्मक कुटुंबात मुली स्वतःची ओळख आणि स्थान निर्माण करण्यातही यशस्वी झाल्या आहेत.
तरीही मुलींसाठी सुरक्षित चौकट असलेली नोकरी निवडण्यावर तिच्या कुटुंबाचा व आजूबाजूच्या लोकांचा भर असतो; जेणेकरून तिला कौटुंबिक जबाबदारी आणि मातृत्व सांभाळून शिक्षण घेता येईल अथवा नोकरी करता येईल. विज्ञान आणि तंत्रशिक्षणाच्या महाविद्यालयांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अगदीच कमी असते. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत हीच अवस्था असते, तिथे कनिष्ठ वर्गातल्या जातीतल्या मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत काय परिस्थिती असेल हे सांगायला नकोच! ज्या कुटुंबात आई-वडील दोघांनाही आजचा दिवस निभावला उद्या काय, ही चिंता सतावत असते. तिथे मुलीने शाळेत जाण्यापेक्षा घरातल्या कामाला हातभार लावावा व जमेल तसे अर्थार्जनही करावे, अशी अपेक्षा असते. तिथे मुलींची शाळा, पुढील शिक्षण, नोकरी असा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट थोडी मोठी झाली की तिचे लग्न करून दुसऱ्या कुटुंबावर तिची जबाबदारी ढकलून देण्याकडे कल असतो. याउलट मुलाला मात्र हवे तितके कष्ट घेऊन शिकवण्याची, त्याला आपल्या पायावर उभे करण्याची तयारी गरीब कुटुंबातही दिसून येते. एवढे करूनही ज्या मुली शाळेत पोचू शकतात, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत मजल मारू शकतात त्यांच्या बाबतीत शाळेत आणि महाविद्यालयातही ही लिंगभेदाची मानसिकता झिरपत आलेली दिसते. त्यावेळी शिक्षक आणि शैक्षणिक संस्था व शिक्षण पद्धती सुद्धा अशाच भेदाभेद मानणाऱ्या समाजाचा एक भाग आहेत याची खात्री पटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड समता संग्रामाच्या वेळी दि. २७ डिसेंबर १९२७ रोजी स्त्रियांना उद्देशून जे भाषण केले, त्यात स्त्रीशिक्षणाचे महत्त्व विशद करताना - "तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत. त्या स्त्रियांनाही आवश्‍यक आहेत,'’ असा उपदेश केला होता. अस्पृश्‍य समाजाच्या प्रगतीसाठी अस्पृश्‍य स्त्रियांची प्रगती होणे आवश्‍यक आहे आणि त्या प्रगतीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणून स्त्री-शिक्षणाकडे पाठ करून चालणार नाही, हा महत्त्वाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भगिनींसमोर मांडावयाचा होता. 'स्त्रियांमध्येही उच्च शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय, त्यांच्यात स्वत्वाची जाणीव निर्माण होऊन, त्या निर्भय होऊन त्यांचा जगण्यातील आत्मविश्‍वास वाढणार नाही आणि आत्मविश्‍वासाशिवाय त्यांची उन्नती होणार नाही.’ असे त्यांचे मत होते. बाबासाहेबांची स्त्री शिक्षणाची ही तळमळ आपण आपल्यात रुजवली असे केव्हा म्हणता येईल? शाळेतल्या वर्तणुकीतला लिंगाधारीत भेदभाव जेव्हा नाहीसा होईल तेव्हाच समतेवर आधारीत समाज प्रत्यक्षात येऊ शकतो!

सारिका उबाळे

विद्यार्थी समुपदेशक व कवयित्री

सारिकाच्या यूट्यूब चॅनलची लिंक 
https://youtube.com/channel/UCD0-Imw6U9O0dpBLhSnYuug


मुलगी शिकली पण प्रगती झाली का?

 

‘मुलगी शिकली, प्रगती झाली!’ हे घोषवाक्य इतकं प्रसिद्ध झालंय की अनेकदा ते विनोदासाठी वापरले जाते. हातात दारूचा ग्लास, सिगरेट असलेल्या मुलीच्या फोटोवर हे घोषवाक्य लिहिलेले अनेक memes सोशल मिडियावर नेहमीच बघायला मिळतात. त्याचबरोबर मुली शिकल्या की आपोआप त्यांची प्रगती होते - असाही एक गोड गैरसमज देखील रूढ होत गेला आहे. आपल्याला शहरातल्या अनेक मध्यमवर्गीय मुली शाळाकॉलेजात जाताना दिसतात; त्यामुळे असा भास होतो की शिक्षणाच्या बाबतीत आपण जणू काही समानतेची पातळी गाठलेली आहे! पण एखादी व्यक्ती शिकल्यामुळे तिची प्रगती होणं म्हणजे नक्की काय ? तर शिक्षणामुळे व्यक्ती विविध निकषांवर सक्षम व्हायला हवी. उदाहरणार्थ, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येणे, राहणीमान उंचावणे, निर्णयप्रक्रियेतला सहभाग वाढणे हे सक्षमतेचे काही निकष म्हणता येतील. पण असे अनेक निकष लावून पाहिले तर आपल्या देशात तरी शिकल्यामुळे मुलींची ‘प्रगती’ होते असं खात्रीने म्हणता येत नाही. 

नुकत्याच प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात (NFHS-5) 2019-2020 मधील जी सरकारी आकडेवारी मांडली गेली आहे त्यानुसार महाराष्ट्रात फक्त 50.4% मुलींना दहा वर्षांपेक्षा जास्त काळ शालेय शिक्षण मिळते. जरी तरुण महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढत असले तरी अजूनही महाराष्ट्रात 15% महिलांना अक्षरओळख देखील नसते. पुरुषांपेक्षा महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण महाराष्ट्रातसुद्धा 10 टक्क्यांनी कमीच आहे. म्हणजे शिक्षणाच्या अगदी सर्वात खालच्या पातळीपासूनच लिंगभेदाला सुरुवात होते. प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना जरी मुलामुलींचे प्रमाण जवळपास सारखे असले तरी पाचवी नंतर वर्गातली मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत जाते. नववीनंतर म्हणजे मासिकपाळी सुरू होण्याच्या वयात तर अनेक मुलींचे शिक्षण थांबते. शाळेच्या रस्त्यावर होणारी छेडछाड आणि शाळेत स्वच्छतागृहा सारख्या मूलभूत सुविधा नसणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत. 22 टक्के मुलींचे 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच लग्न उरकून टाकले जाते. यावर्षी करोना काळात तर हे प्रमाण वाढलेच आहे.

आपल्या देशात ग्रामीण भागात शाळेत प्रवेश घेणार्‍या शंभर मुलींपैकी फक्त एक मुलगी बारावी पर्यन्त पोचू शकते. ज्या मुली कॉलेजात प्रवेश घेतात, त्या तरी कुठले अभ्यासक्रम निवडतात? ह्याचा शोध घेतला तर लक्षात येतं की मुलींना साधारणपणे बी.ए.ची पदवी देणाऱ्या कोर्सेसना घातलं जातं. चांगल्या पगाराची किंवा अधिकाराची नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने बी.ए. चा कोर्स फारसा उपयोगी पडत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. कलाशाखेच्या अभ्यासक्रमात मुलींची संख्या मुलांपेक्षा दहाटक्क्यांनी जास्त असते. पण सायन्स आणि कॉमर्सच्या अभ्यासक्रमात मात्र मुलगेच जास्त संख्येने दिसून येतात. तंत्रशिक्षण आणि इन्जिनिअरिन्गच्या कोर्सेसमध्ये तर मुलींची संख्या मुलांच्या संख्येहून निम्मीच असते. इन्जिनिअरिन्गचे शिक्षण देण्यासाठी आपल्या देशात सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या आयआयटी मध्ये मुलींचे प्रमाण फक्त ८% आहे. या विषमतेचे परिणाम आपोआपच स्त्रियांच्या अर्थार्जनाच्या संधीवर होतो. स्त्रिया सेवाक्षेत्रात आणि असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करतात. पण जिथे जास्त पगार मिळू शकतो अशा विज्ञान, तंत्रज्ञान इ. क्षेत्रात अधिकाराच्या जागी फारशा स्त्रिया  दिसत नाही.

महाराष्ट्रातल्या महिला तंत्रज्ञान साक्षरतेपासून तर खूपच दूर आहेत. पुरुषांमध्ये इंटरनेट साक्षरतेचे प्रमाण ६१.५ टक्के इतके आहे आणि महिलांमध्ये फक्त ३८ टक्के इंटरनेटसाक्षरता आहे. महिलांकडे स्वत:चा स्मार्टफोन असण्याचे प्रमाणही खूप कमी आहे, असे अनेक सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यामुळे देखील त्यांना इंटरनेटशी संबंधित अनेक सुविधांचा उपयोग करून घेता येत नाही. स्वत:च्या नावावर घर किंवा जमीन असणाऱ्या महिलांचं प्रमाण जेमतेम 23 टक्के आहे आणि दुर्दैवाने हे प्रमाण 2015-16 पेक्षा कमी झालेले आहे. पण नवऱ्याकडून होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण मात्र वाढलेले आहे.

 दलित मुलींना शालेय जीवनापासूनच शिक्षणाच्या संधी कमी मिळतात.

या मुलींवर एक स्त्री म्हणून होणार्‍या अन्यायासोबत जातीय भेदभाव आणि आर्थिक वंचनेचेही ओझे असते. 

महाराष्ट्रातल्या ‘मागास’ समजल्या जाणार्‍या जातीजमातींमधील मुलींच्या शिक्षणात येणार्‍या अडथळ्यांविषयी शैलजा पाईक यांनी बराच अभ्यास केलेला आहे. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की या मुलींवर एक स्त्री म्हणून होणार्‍या अन्यायासोबत जातीय भेदभाव आणि आर्थिक वंचनेचेही ओझे असते. म्हणजेच ह्या मुलींना तिप्पट भेदभावाला तोंड द्यावे लागते. त्यांच्या निरीक्षणानुसार दलित मुलींना शालेय जीवनापासूनच शिक्षणाच्या संधी कमी मिळतात. वंचित समाजात अजूनही मुलीपेक्षा मुलांच्याच शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. मुलांना त्यांच्या समाजातून शिक्षणासाठी जितका पाठिंबा मिळतो तितका पाठिंबा मुलींना मिळू शकत नाही. एखादी मुलगी जर सगळ्या अडचणीना तोंड देत उच्च शिक्षणासाठी शहरात पोचलीच तर तिथे सगळीकडून होणार्‍या कोंडीमुळे ह्या मुलींमधील एकटेपणाची भावना वाढत जाते आणि त्यातून डॉक्टर पायल सारख्या मुलींचे बळी जातात.

आपल्या समाजाला एकुणातच महिलांनी घराबाहेर पडून काम करणे आणि पैसे कमावणे पसंत नाही. महिलांच्या आयुष्यात लग्न होणे, शिक्षण थांबणे आणि जन्मगाव सोडून वेगळ्या ठिकाणी राहायला जावे लागणे अशा विविध प्रकारचे बदल घडत राहतात – त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम होण्यासाठी पुरुषांपेक्षा पाच ते दहा वर्षे उशीर होतो. गेल्या काही वर्षात भारताची आर्थिक प्रगती झपाट्याने झालेली असूनसुद्धा श्रमशक्ती मधील महिलांचा सहभाग कमी होत चाललेला आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणात ३५% महिलांनी सांगितलेलं आहे की त्यांना घराबाहेर पडून पैसे मिळवण्याची इच्छा आहे. तरीही गेल्या काही वर्षापासून महिलांनी नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक पुरुषांना आपल्या बायकोने पैसे मिळवणे अपमानास्पद वाटते; शिवाय लग्न झालेल्या महिलांवर घरकामाच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. अनेकजणीना घरकामाच्या ओझ्यामुळे किंवा मुलांची काळजी घ्यायला पुरेशा सोयी नाहीत म्हणून नोकरी सोडावी लागल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी जर पाळणाघराच्या सोयी उपलब्ध झाल्या तर अनेक महिलांना नोकरी करता येईल. 

कामाच्या ठिकाणची असुरक्षितता 

ही नोकरदार महिलांची महत्त्वाची अडचण असते!

याशिवाय कामाच्या ठिकाणची असुरक्षितता ही नोकरदार महिलांची महत्त्वाची अडचण असते! जर स्त्रियांचा सहभाग पुरुषांइतका वाढला तर देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न तब्बल ६० टक्क्यांनी वाढेल, असं मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूट ह्या आंतरराष्ट्रीय पाहणी संस्थेचे मत आहे. पण पितृसत्ताक समाजाने महिलांवर टाकलेल्या दडपणामुळे देशाच्या श्रमशक्ती मधला स्त्रियांचा सहभाग आक्रसला आहे. म्हणून हे चित्र बदलायचे असेल तर त्यासाठी अर्थातच पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल आणि त्याच्यासाठी पुरुषांनाच पुढाकार घ्यायला लागेल! आपल्या बरोबरीने वाढणाऱ्या, खेळणाऱ्या, काम करणाऱ्या, स्पर्धा करणाऱ्या मुली म्हणजे पुरुषांच्या अस्तित्वाला धोका नाहीत – हे पुरुषांनी स्वीकारले तरच स्त्रियांना स्वत:च्या कौशल्यांचा विकास आणि उपयोग करता येईल.

वंदना खरे

 संपादक, 'पुन्हास्त्रीउवाच'